“पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान”   

UN मधील माजी प्रतिनिधी अकबरुद्दीन यांचे दक्षिण आफ्रिकेत वक्तव्य

जोहान्सबर्ग : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे क्रिकेटच्या मैदानावरील पाकिस्तानबरोबरचे संबंध आणखी बिघडले आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारताने आपला क्रिकेट संघ पाकिस्तानला पाठवलेला नाही. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करणे थांबवत नाही तोवर भारतीय संघ पाकिस्तानच्या भूमीवर पाय ठेवणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे. याबाबत भारताचे यूएनमधील (संयुक्त राष्ट्रे) माजी प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी मोठे वक्तव्य केले.
 
अकबरुद्दीन म्हणाले, “क्रिकेट आमच्यासाठी केवळ एक खेळ नाही, ते आमचं वेड आहे. परंतु, काही घटना इतक्या खोलवर परिणाम करतात की त्यामुळे आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून विचार करावा लागतो”.

“भारताने आणखी एका देशाबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले”

सैय्यद अकबरुद्दीन १९९० च्या दशकाचा उल्लेख करत म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदामुळे भारताने या देशाबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले होते.  मात्र, आता आम्ही आणखी एका देशाबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले आहे. परंतु, केवळ एका दहशतवादी हल्ल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला नाही. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मोठ्या संख्येने निर्दोष लोक मारले गेले. परंतु, हे केवळ निर्दोष व्यक्तींचा जीव गमावल्याचे प्रकरण नाही. तो आमच्या सामाजिक व आर्थिक स्तरावर केलेला हल्ला होता. त्यांनी आमच्या सामाजिक एकतेवर, आमच्या अस्मितेवर आणि अस्तित्वावर हल्ला केला. आम्ही हे सहन करू शकत नाही”.

भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १० पटीने मोठी : अकबरुद्दीन

भारताचे यूएनमधील माजी प्रतिनिधी म्हणाले, “इस्लामाबाद पुरस्कृत दहशतवादी हल्ला केवळ भारताच्या सुरक्षेपर्यंत मर्यादित नाही. भारताची आर्थिक गदी मंद करण्याचा तो मोठा प्रयत्न आहे. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भारत व पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रे एकाच दिवशी स्वतंत्र झाली होती. एकाच दिवशी दोन्ही देशांनी आपल्या सामाजिक व आर्थिक प्रगतीची सुरुवात केली होती. मात्र, आज आमची अर्थव्यवस्था पाकिस्तानपेक्षा १० पट मोठी आहे. महाराष्ट्रासारख्या आमच्या एका राज्याची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या पूर्ण अर्थव्यवस्थेपक्षा मोठी आहे”.

भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून द. आफ्रिकेत पाकिस्तानचा पर्दाफाश

सैय्यद अकबरुद्दीन हे जोहान्सबर्ग येथे बोलत होते. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी, त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवली आहेत. यामध्ये बरेच आजी-माजी सनदी अधिकारी देखील सहभागी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील भारताचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज जोहान्सबर्गमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळाने येथील प्रसारमाध्यमे व बुद्धीजीवी लोकांशी संवाद साधला. यावेळी अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली.

Related Articles